शास्त्री फार्मसी महाविद्यालयात नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार

एरंडोल : शास्त्री फार्मसी महाविद्यालय येथे शिवजन्मोत्सवाच्या औचित्याने एरंडोल नगरपालिकेतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींना सन्मान देत समाज आणि शैक्षणिक संस्थांमधील नाते दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल पाटील उपस्थित होते. तसेच एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष सौ. सुनीता माळी व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींमध्ये गटनेते प्रा. मनोज पाटील, जिजाबाई पाटील, अनिल महाजन, पठाण दलशेख, कल्पना पाटील, आरती महाजन, सय्यद जाफर, छायाबाई दाभाडे, भारती गुजर, सय्यद नरुद्दीन, गीतांजली ठाकूर, कृष्णा ओतारी, कागदी सय्यद, अमोल तांबोळी, नितेश चौधरी, योगेश महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन व नरेंद्र पाटील यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिवजन्मोत्सवाच्या पवित्र निमित्ताने आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी सादरीकरण करून वातावरण उत्साहपूर्ण केले.
प्रा. अनुप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात लोकप्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्था यांच्या परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार अमोल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यातून शौर्य, दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे धडे मिळतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून जीवनात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या संशोधनासोबतच सांस्कृतिक जडणघडणीतही महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केले.
नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, नागरिक आणि शैक्षणिक संस्था यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. युवकांनी शिक्षणासोबत समाजकार्याची जाणीव ठेवावी, असे मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्षांनी महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज अधोरेखित केली.
एस. आर. बापू यांनी आपल्या भाषणात आरोग्य, शिक्षण आणि शहराचा विकास हेच प्रथम कर्तव्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला यांनी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक संस्थेची मोलाची भूमिका असल्याचे सांगितले. शालिग्राम गायकवाड यांनी सर्वधर्म समभाव जपत कार्य केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी एरंडोल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या नियोजनातून हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जावेद शेख यांनी आभार प्रदर्शन केले. समाज आणि शैक्षणिक संस्थांमधील संबंध दृढ करणारा हा नागरी सत्कार सोहळा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला.




