नथ्थूबापूंच्या यात्रेमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने चोरीस जात असल्याने ; भीतीचे वातावरण…

प्रतिनिधी – एरंडोल नथ्थूबापूंच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात्रेच्या गर्दीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून महिलांच्या सोन्याचे दागिने कापण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेच्या परिसरात संपूर्ण दिवस भक्तांची वर्दळ असते. धार्मिक दर्शनासाठी तसेच विविध दुकानांवर खरेदीसाठी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरटे गर्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे, चेन व इतर सोन्याचे दागिने कापून पसार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
काही महिलांना चोरीनंतरही घटनेची जाणीव उशिरा होत असल्याचे समोर येते. यामुळे चोरटे सहजपणे गर्दीचा फायदा घेत पळ काढतात. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या असून पीडित महिलांनी पोलिसात तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी गर्दीला योग्यरीत्या नियंत्रणात ठेवण्यासाठी व संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक कडक उपाययोजनांची मागणी होत आहे.
भाविक आणि नागरिकांची मागणी:
यात्रेत महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस पथक
सीसीटीव्ही कॅमेरे वाढविणे
गर्दीत टेहळणीसाठी पोलीस व स्वयंसेवकांची संख्या वाढवावी जागृतीसाठी ध्वनिवाहिनीच्या माध्यमातून सतत सूचना द्याव्यात
भाविकांनी सुरक्षेची काळजी घेत मौल्यवान दागिने घालणे टाळावे व संशयित व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
यात्रा ही श्रद्धेचा विषय असताना चोरट्यांच्या वाढत्या घटनांमुळे वातावरणात भीतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून सुरक्षा वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



