पिंपळकोठा बु. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात; आमदार अमोल दादा पाटील यांची उपस्थिती

एरंडोल : तालुक्यातील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, पिंपळकोठा बु. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास आमदार अमोल दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी सांगितले की, दहावीची परीक्षा ही आयुष्यातील पहिली मोठी पायरी असून या टप्प्यावर घेतलेले परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासच पुढील यशाची दिशा ठरवतात. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाणे हेच खरे यशाचे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, आई-वडिलांचे व गुरुजनांचे संस्कार जपावेत तसेच समाजासाठी काहीतरी देण्याची भावना मनात ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




