एरंडोल स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांकडून तातडीने स्वच्छता व कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची मागणी

प्रतिनिधी – एरंडोल शहरातील मुख्य स्मशानभूमीची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, परिसरात सर्वत्र घाण, कचरा व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, या गंभीर परिस्थितीकडे नगरपरिषदेने तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्मशानभूमी परिसरात कचऱ्याचे ढीग, वाढलेली झाडाझुडपे, प्लास्टिक कचरा तसेच दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता असून, यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबीयांना मानसिक दुःखाबरोबरच अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्मशानभूमीत नियमित साफसफाईसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावा, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता साहित्य, प्रकाश व्यवस्था व योग्य देखभाल व्यवस्था असावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सध्या कोणतीही निश्चित जबाबदार व्यक्ती नसल्याने स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे.
“स्मशानभूमी हे केवळ एक सार्वजनिक ठिकाण नसून, प्रत्येक कुटुंबाच्या शेवटच्या संस्काराशी निगडित अत्यंत संवेदनशील स्थळ आहे. अशा ठिकाणी घाण व दुर्लक्ष असणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे द्योतक आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
नगरपरिषदेने तात्काळ पाहणी करून स्वच्छता मोहीम हाती घ्यावी व भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.



