सासरच्या जाचाला कंटाळून ३२ वर्षीय जावयाची गळफास घेवून आत्महत्या.

सासू,मेव्हणी,साडू विरोधात गुन्हा दाखल.
प्रतिनिधी एरंडोल- सासरच्या जाचाला कंटाळून भातखेडे (ता.एरंडोल) येथील गौरव ज्ञानेश्वर बडगुजर या ३२ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी गौरव बडगुजर याने चिठ्ठी लिहिली असून
त्यामध्ये सासू,मेव्हणी व साडू यांच्या धमक्यांना व जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.मयताचे वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून कासोदा पोलीस स्थानकात सासू,मेव्हणी,साडू यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की,भातखेडे येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पुंडलिक बडगुजर यांचा लहान मुलगा गौरव ज्ञानेश्वर बडगुजर यांचा विवाह धुळे येथील संजय बडगुजर यांची कन्या दिपाली यांचेशी ११ फेब्रुवारी २३ रोजी झाला
होता.विवाहाचा सर्व खर्च ज्ञानेश्वर बडगुजर यांनी केला होता.विवाहानंतर एक ते दीड वर्ष गौरव व दिपाली यांचा सुखाने संसार सुरु होता.विवाहानंतर गौरव यास कन्यारत्न झाल्यामुळे बडगुजर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण
होते.त्यानंतर गौरवची पत्नी दिपाली किरकोळ कारणावरून वाद घालत होती.एक वर्षापासून दिपाली मुलीसह माहेरी धुळे येथे निघून गेली होती.गौरवची सासू अनिता बडगुजर,मेव्हणी गौरी गरुड,साडू भटू गरुड यांनी गौरव यास अनेकवेळा
फोन करून लग्नात झालेला खर्च द्या अशी मागणी करून धमकी देत होते.सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात असल्यामुळे तसेच धमक्या
दिल्या जात असल्याने गौरव अनेक दिवसांपासून निराशपणे राहत होता.गौरवाचे वडील ज्ञानेश्वर बडगुजर यांनी त्यास याबाबत अनेक वेळा विचारणा केल्यानंतर मला पैशांची अडचण असल्याचे सांगितल्याने वडिलांनी त्यास चार लाख रुपये दिले होते.गौरवाची सासू,मेव्हणी व साडू हे वारंवार फोन करून गहाण ठेवलेले सोने सोडवायचे आहे.धुळे येथे घर घ्यावयाचे आहे असे सांगून पैशांची मागणी करीत होते.गौरव हा वडील ज्ञानेश्वर बडगुजर यांचेसह गावातील दोन जणांसह
धुळे येथे २ फेब्रुवारी रोजी दिपाली हिस आणण्यासाठी गेले होते.मात्र सासरच्या मंडळींनी गौरवसह त्याच्या वडिलांशी वाद घालून अपमानित केले होते.त्यानंतर देखील सासरच्या मंडळींकडून कायम पैशांची मागणी करून जीवे
मारण्याची धमकी दिली जात होती.२६ फेब्रुवारी रोजी गौरवचे वडील ज्ञानेश्वर बडगुजर त्याचे भाऊ व घरातील सदस्य नासिक येथे विवाहासाठी गेले होते.घरी कोणीच नसतांना गौरव याने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी गौरवने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये सासू,मेव्हणी व साडू यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मजकूर लिहिला आहे.मला त्रास देणा-या सासू,मेव्हणी व साडू यांनी तुम्हाला खूप रडवले
असून त्यांना सोडू नका यासह झालेल्या त्रासाबद्दल मजकूर लिहिला आहे.याबाबत गौरवाचे वडील ज्ञानेश्वर बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासू,मेव्हणी व साडू यांचे विरोधात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांचे
मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज पाटील तपास करीत आहेत.मयत गौरवचे वडील भातखेड्याचे माजी सरपंच असून रेशन दुकानदार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष व शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख आहेत.मयत गौरवचे पश्चात आई , वडील,भाऊ व दीड वर्ष वयाची मुलगी असा परिवार आहे.




