फुले दांपत्यांच्या स्मारकासाठी सावता सेनेचे नगरपरिषदेला निवेदन..

विशेष प्रतिनिधी :-अंबरनाथ शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या पुतळ्यासह भव्य कमान उभारण्यात यावी आणि त्या परिसराला फुले दांपत्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सावता सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अंबरनाथ नगर परिषदेच्या नव्या जागेत किंवा गोविंद पुलाजवळ नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान परिसरात फुले दांपत्यांचे पुतळे उभारण्यात यावेत. समाजप्रबोधन, शिक्षण प्रसार आणि सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे सावता सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी सावता सेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल माळी, देविदास महाजन, वसंतराव महाजन, तुकाराम महाजन, शांतराम महाजन, शंकर देवरे, जनार्दन खैरनार, निलेश पवार, प्रल्हाद महाजन, कैलास वाडीले यांच्यासह ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी माळी, स्वाती महाजन, ऋचा महाजन, सुलोचनाताई महाजन, कल्पना महाजन आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
सदर मागणीचा नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा सावता सेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.





