एरंडोलकरांचा पाणीप्रश्नी आक्रोश ; नियमित व वेळेनुसार पाणीपुरवठ्याची नगरपालिकेकडे निवेदन आंदोलनातून मागणी

एरंडोल : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे नियमित व नियोजित पाणीपुरवठ्याची जोरदार मागणी केली आहे. नगर परिषदेकडे दिलेल्या निवेदनात शहरात अंजनी धरण असतानाही पाणीपुरवठा अनियमित होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी, संघर्ष समिती वकील संघ यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सध्या शहरात सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून त्यातही निश्चित वेळ पाळली जात नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत जागून पाणी भरावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
तसेच काही भागात कमी दाबाने पाणी येते, तर काही ठिकाणी पाणी पोहोचतच नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
तर काही प्रभागात जास्त वेळ पाणी सोडले जाते.
अंजनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून शहरात पूर्वीप्रमाणे नियमित तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, सर्व भागात समान दाबाने पाणी पोहोचवावे तसेच पाणीपुरवठ्यात बदल असल्यास नागरिकांना आगाऊ सूचना द्यावी,याशिवाय सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेतच पाणीपुरवठा करावा, जेणेकरून शेतकरी, कामगार व नोकरदार नागरिकांना केवळ पाण्यासाठी दिवसभर घरी थांबावे लागणार नाही, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.
निवेदनावर रवींद्र लांडगे अध्यक्ष संघर्ष समिती, वकील संघाचे ॲड आकाश महाजन,ॲड दिनकर पाटील ,नामदेवराव पाटील, दिनेश चव्हाण, गणेश बडगुजर, नाना मिस्तरी, गुलाब चौधरी, प्रवीण महाजन, चंद्रकांत बाविस्कर सुरेश देशमुख, अजय वाणी, यांच्यासह असंख्य नागरिकांनी उस्फूर्तपणे निवेदन आंदोलनास हजेरी लावली यामध्ये महिलांचा समावेश देखील उल्लेखनीय होता.
“जल ही जीवन आहे” असा संदेश देत नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




