शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

एरंडोल – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे समाजसुधारक, शिक्षणप्रणेते आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन केले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री यांच्या प्रेरणेने तसेच संस्थापक सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विभागप्रमुख प्रा. जावेद शेख यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी उभे राहून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
प्रा. जावेद शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महात्मा फुले यांच्या शिक्षणविषयक धोरणांची आणि सामाजिक सुधारणांमधील योगदानाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विशेषतः स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करावा, असे आवाहन केले. समता, बंधुता आणि शिक्षण हीच समाज प्रगतीची खरी साधने असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. योगेश्वरी लोहार यांनी मांडली. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानप्रधान युगातील महत्त्व अधोरेखित करताना, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. करण पावरा, प्रा. दिग्विजय पाटील आणि प्रा. चंद्रभान पाटील यांनीही आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याची सुसंगतता आजही तितकीच प्रभावी असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. अनेक विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, विचार मांडणी आणि प्रेरणादायी प्रसंग सादर केले. या सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव, समतेची भावना आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी प्रा. अनिता वळवी, प्रा. श्रद्धा शिवदे, प्रा. राहुल अहिरे, प्रा. गायत्री सूर्यवंशी, प्रा. रूपाली पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समतामूलक व प्रगत समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करण्यासोबतच राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने सकारात्मक प्रेरणा दिली.





