सत्यशोधक पद्धतीने आदर्श विवाह संपन्न; सामाजिक समतेचा दिला संदेश..

प्रतिनिधी — कापडणे येथे माळी समाजातील एक आदर्श विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने उत्साहात आणि साधेपणाने संपन्न झाला. धरणगाव येथील बाजीराव अंबादास महाजन यांची सुकन्या चि. सौ. का. नीलिमा आणि कै. विनायक सदाशिव माळी यांचे ज्येष्ठ चिरंजीव खुशाल यांचा विवाह महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने व सत्यशोधक पद्धतीने पार पडला.
या विवाह सोहळ्यात अनाठायी खर्च, दिखाऊपणा आणि जुन्या परंपरांना फाटा देत सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून विवाह विधी संपन्न करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी नवदांपत्यास शुभाशीर्वाद देत समाजात सत्यशोधक विवाह चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनीही नवदांपत्याच्या निर्णयाचे कौतुक करत हा विवाह समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
सोहळ्यास नातेवाईक, समाजबांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनपर विचारांचा संगम असलेला हा विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.




