शहीद स्मारकासाठी पवित्र माती संकलित.

एरंडोल – येथे देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या शहीद स्मारक भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने एरंडोल येथील वीर शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या गावातील पवित्र माती संकलित करण्यात आली. सदर माती शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत संकलित करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
शहीद जवानांच्या गावातील माती संकलित करण्याचा हा उपक्रम केवळ औपचारिकता नसून, देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाला मानवंदना देणारा भावनिक उपक्रम आहे. ज्या मातीत वीर जवानांचे बालपण गेले, त्या मातीचा कण शहीद स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या अमर स्मृतींशी जोडला जाणार आहे.
शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या सर्वोच्च बलिदानाला एरंडोल नगरपरिषदेतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागालाही यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यासाठी कार्यालय अधीक्षक एस. आर. ठाकूर, आशिष परदेशी,विनोद जोशी व योगेश सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
“शहीदांचे बलिदान विसरता कामा नये; त्यांच्या शौर्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





