अंजनी नदीचे काँग्रेसतर्फे जलपूजन

पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटल्याने समाधान; शेतकऱ्यांना दोन-तीन आवर्तनांची अपेक्षा
प्रतिनिधी एरंडोल : अंजनी मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने एरंडोल, धरणगाव, कासोदा शहरासह परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला आहे. या पार्श्वभूमीवर एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि. ८) अंजनी मध्यम प्रकल्प येथे अंजनी नदीचे जलपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष विजय अण्णा महाजन यांच्या हस्ते अंजनी नदीचे जलपूजन करण्यात आले. यावेळी वरुणराजाचे आभार मानून अंजनी मातेला श्रीफळ अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली.
अंजनी प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे एरंडोल, धरणगाव, कासोदा शहरांसह परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या दृष्टीनेही दिलासा मिळाला असून, उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे शेतीसाठी दोन ते तीन आवर्तने मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील गोविंदा पाटील, शहराध्यक्ष संजय भदाणे, ज्येष्ठ कार्यकर्ते कमर अली सय्यद, जिल्हा सचिव सागर पाटील, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतन पाटील, डॉ. प्रशांत पाटील, सुभाष चौधरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





