धीरज भाऊ परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

राजपूत करणी सेनेचे तहसीलदारांना निवेदन; दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षेची मागणी
प्रतिनिधी एरंडोल : समाजबांधव स्वर्गीय धीरज भाऊ परदेशी यांच्या हत्या प्रकरणाचा निष्पक्ष व जलदगतीने तपास करून आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींचा दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत एरंडोल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. स्वर्गीय धीरज भाऊ परदेशी यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी व संतापजनक घटना असून, या घटनेमुळे समाजबांधवांमध्ये तीव्र दुःख व संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्षपणे व जलदगतीने करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. तसेच दोष सिद्ध झाल्यास न्यायालयाने कायद्यातील तरतुदींनुसार कठोर शिक्षा सुनावावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते शासनाच्या संबंधित विभागाकडे तातडीने पाठवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय राजपूत श्री करणी सेनेचे खान्देश विभाग उपाध्यक्ष पी. जी. पाटील, एरंडोल तालुका अध्यक्ष जितेंद्र धनसिंग पाटील, तालुका उपाध्यक्ष सागर गोकुळ पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, तसेच पिंटू राजपूत, सतीश पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील पाटील, अनिल सिशोदिया, देवेंद्र पाटील, कुलदीप पाटील, दिनेश पाटील, राजेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी “धीरज भाऊ परदेशी यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशी ठाम भूमिका व्यक्त करत आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.






