मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा ६१ वा स्मृतिदिन ‘आध्यात्मिक ज्ञान दिवस’ म्हणून साजरा
एरंडोल, प्रतिनिधी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रथम मुख्य प्रशासिका मातेश्वरी जगदंबा सरस्वती (ओम राधे) यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार, २४ जून रोजी देश-विदेशातील सर्व ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रांवर ‘आध्यात्मिक ज्ञान दिवस’ विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रद्धाभावाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने एरंडोल येथील स्थानिक सेवाकेंद्रात विशेष राजयोग, ध्यानसाधना, योगाभ्यास व आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा जन्म सन १९१९ मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये आध्यात्मिकतेची विशेष ओढ होती. त्यांना ‘ओम राधे’ या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या मुखातून सतत उच्चारला जाणारा ‘ओम’ हा शब्द परिसरात शांतता, पवित्रता व सकारात्मकतेचा अनुभव देत असे. त्यामुळे त्या ‘ओम राधे’ या नावाने सर्वत्र परिचित झाल्या.
प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या सान्निध्यात त्यांनी ईश्वरीय ज्ञान आत्मसात करून अध्यात्म, सेवा व त्यागाचा मार्ग स्वीकारला. समाजातील महिलांना अनेक बंधनांना सामोरे जावे लागत असलेल्या काळात त्यांनी नारीशक्तीचा आदर्श निर्माण केला. आत्मबल, आध्यात्मिक शक्ती आणि दृढ संकल्प यांच्या बळावर त्यांनी मानवसेवेचे व्यापक कार्य उभारले.
२४ जून १९६५ रोजी त्यांनी आपला नश्वर देह त्यागून संपूर्णत्वाची प्राप्ती केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ब्रह्माकुमारीज् परिवारात ‘आध्यात्मिक ज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या शिकवणुकीतून लाखो लोकांना जीवनातील मूल्ये, आत्मज्ञान आणि शांततेचा मार्ग मिळाला आहे.
मातेश्वरी जगदंबा यांनी आपल्या तपस्या, त्याग, सेवाभाव आणि आध्यात्मिक सामर्थ्याद्वारे मानव समाजाला जीवनमुक्तीचा संदेश दिला. त्यांच्याच प्रेरणेने दादी प्रकाशमणी, दादी जानकी, दादी हृदयमोहिनी यांच्यासह अनेक वरिष्ठ बहिणींनी मानवकल्याणाची सेवा पुढे नेली. या महान आत्म्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान आणि मानवी मूल्यांचा संदेश जगातील १४० हून अधिक देशांपर्यंत पोहोचला आहे.
आधुनिक युगातील चैतन्यदेवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातेश्वरी जगदंबा यांचे जीवन आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. विश्वशांती, मानवी मूल्यांचे संवर्धन आणि आध्यात्मिक जागृती यासाठी ब्रह्माकुमारीज् संस्था त्यांच्या आदर्शांवर चालत कार्यरत आहे.
याबाबत माहिती देताना स्थानिक ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी यांनी सांगितले की, “मातेश्वरी जगदंबा यांचे संपूर्ण जीवन त्याग, तपस्या आणि मानवसेवेचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांद्वारे त्यांच्या विचारांचे स्मरण करून आत्मिक उन्नतीचा संकल्प केला जाईल.”
या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.





